कल्याण दि.15 जून :
मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असणारी मुंबई लोकल तब्बल 84 दिवसांनंतर आजपासून पुन्हा सुरू झाली. कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनमूळे ही मुंबई लोकल बंद करण्यात आली होती.
मात्र आजपासून ही लोकल सेवा सुरू झालेली असली तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गालाच त्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. लोकल सेवा बंद असल्याने एसटी आणि इतर रस्ते वाहतुकीवर आलेला ताण आणि त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग होत नसल्याने वाढलेले कोरोना रुग्ण. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तर लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती.त्यानूसार काल रात्री उशिराने याबाबत लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान यातून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाचा प्रवास करता येणार असून त्यांचे आयकार्ड पाहूनच पोलिसांकडून त्यांना तिकीट देण्यासह प्लेटफॉर्मवर सोडले जात असल्याचे कल्याण स्टेशनवर दिसून आले. दर अर्ध्या तासाने ही लोकल धावणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात असल्याने प्लॅटफॉर्मवर अजिबात गर्दी दिसत नाहीये. तर लोकलमध्येही एका सीटवर एका प्रवशालाच बसवण्यात येत असून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन होत असल्याचे दिसतंय.