कल्याण दि.6 जून :
महापालिका क्षेत्रातील कचरा उचलण्याचे काम दिलेल्या आर अँड बी कंपनीला काळ्या यादीत टाकून कोणत्याही प्रकारचे देयक न देण्याची मागणी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
या कंपनीला गेल्या 2 वर्षांपासून महापालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र सध्याच्या कोरोना आपत्कालीन परिस्थितीत गैरफायदा घेऊन वर्गीकरणाचे कारण पुढे करत जाणीवपूर्वक ही कंपनी कचरा उचलत नसल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे. पूर्वी कचरा सरसकट डेब्रिजसह उचलला जात असल्याने जास्तीची बिल काढली जायची. मात्र आता कचऱ्याचे वर्गीकरण होत असल्याने हे जास्तीचे बिल निघणार नसल्याने कचरा उचलला जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तर ठरवलेल्या अटी -शर्तींनूसार या कंपनीने स्वतःच्या किती आरसी आणि रिंगर बेल गाड्या आणल्या आहेत? रस्त्यावर केवळ महापालिकेच्याच गाड्या दिसत असल्याचे सांगत या कंपनीने कचरा उचलण्याचे बोगस बिल सादर केल्याचा संशयही शेट्टी यांनी व्यक्त केला. महापालिकेशी झालेल्या करारानुसार ही कंपनी काम करत नसून अनेक नगरसेवकांच्या याबाबत तक्रारी असल्याने तिला काळ्या यादीमध्ये टाकून देयक अदा न करण्याची मागणी शेट्टी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.