डोंबिवली दि.11 जुन :
दुकाने सुरू करण्याबाबत काल संपूर्ण महाराष्ट्रात नाभिक समाजाच्या संघटनांनी शासनाला निवेदनाद्वारे दुकाने सुरू करण्याची मागणी केली. कल्याणपाठोपाठ आज डोंबिवलीतील नाभिक समाज बांधवांनीही तहसीलदारांना निवेदन सादर करत आपली कैफियत मांडली.
इतर दुकानांप्रमाणे आम्हालाही दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी या प्रमुख मागणीसाठी नाभिक समाज बांधव शासकीय स्तरावर पाठपुरावा करत आहे. काल कल्याण आणि आसपासच्या परिसरातील नाभिक व्यवसायिकांतर्फेही कल्याण तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. त्यापाठोपाठ आज डोंबिवलीतील नाभिक संघटनेचे शिष्टमंडळानेही तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला.
नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. गेल्या 80 दिवसापासून सलून व्यावसायिक उपासमारीचा सामना करत आहेत. सर्व स्तरातील लोकं त्यांना घरी सेवा करण्यास बोलावत आहेत. दुकाने बंद असूनही विजवितरण कंपनीने बिलं दिली आहेत. शासनाने सलून व्यावसायिकांचा विचार करून अटी आणि शर्थीवर दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी अनिल पंडित, (कोकण विभाग उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), मा. अरुण जाधव (उपाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ), भालचंद्र मोरे (ठाणे जिल्हा अध्यक्ष). बाळा पवार, बाबासाहेब राऊत,. अशोक आतकरे, सोनाली चव्हाण (जिल्हाध्यक्ष, ठाणे) भाऊसाहेब शिंदे, ठाणे जिल्हा अध्यक्ष,(ग्रामीण) इत्यादी नाभिक बांधव उपस्थित होते.