कल्याण दि.5 जून :
आज ‘वटपौर्णिमा’ महिला वर्गाचा आपल्या संस्कृतीमधील एक महत्वाचा सण आणि दुसरीकडे आज जागतिक पर्यावरण दिनही. मात्र कोरोनाच्या संकटातही कल्याणातील आधुनिक सावित्रीनी पर्यावरणाचे रक्षण करत आपली संस्कृतीही जतन केलेली पाहायला मिळाली.
कल्याण पश्चिमेच्या सुंदर नगर सोसोयटीतील महिलांतर्फे हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. आज जगात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून आपली कल्याण डोंबिवलीही त्यातून सुटलेली नाहीये. परंतु कल्याणातील या आधुनिक सावित्रीनी आज अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करून पर्यावरणाचे रक्षण तर केलेच. पण त्याचबरोबर आपली सांस्कृतिक परंपराही अबाधित ठेवली.
पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी या महिलांनी कागदापासून वडाचे झाड आणि मातीपासून नारळ,सुपारी वगैरे फळं बनवली होती. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वेळी सोसायटीमधील 5 महिलांनाच पूजेसाठी आमंत्रित करण्यात येत होते. या अनोख्या उपक्रमातून पर्यावरण आणि संस्कृती रक्षण हे दोन्ही हेतू साध्य झालेले पाहायला मिळाले.