कल्याण दि.1 जून :
कल्याणातील एका कल्पक मेकॅनिकने कोरोना प्रादुर्भावाचा कमी धोका असणारी अशी अनोखी रिक्षा बनवली आहे. संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापासून सर्व वाहतूकीबरोबरच रिक्षा वाहतूकही बंद आहे. त्यामूळे रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र किती काळ हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा समोर असलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या उद्देशाने कल्याणातील गफूर शेखने ही अनोखी रिक्षा बनवली आहे.
कोरोनाचा धोका असल्याने रिक्षा प्रवासावर बंदी असल्याचे लक्षात घेऊहन सुरक्षित रिक्षा प्रवासासाठी त्याने आपल्या रिक्षेमध्ये खास असे सॅनिटायजरचे फवारे बसवले आहेत. विशेष म्हणजे सोशल डिस्टनस पाळून दोन प्रवासी बसण्याच्या ठिकाणी हे सॅनिटायजरचे फवारे लावण्यात आले आहेत. रिक्षामध्ये बसण्यापूर्वी हाताला सॅनिटायजर लावूनच रिक्षामध्ये प्रवेश दिला जातोय. तर पैसे घेण्यासाठी पेटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेणेकरून प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये कमीत कमी संपर्क येईल आणि कोरोनाचा धोकाही टळू शकेल.
कोरोनाबरोबर राहण्याची मानसिकता तयार करण्याचे आवाहन सरकरकडून करण्यात आले आहे. आता गफूर शेखसारखे जागरूक नागरिक आपली जबाबदारी ओळखून आपला व्यवसाय करण्यास सज्ज आहेत. आता खरी गरज आहे ती शासनाने अशा लोकांना सहकार्य करण्याची आणि त्यांच्या कल्पकतेचा लाभ इतरांनाही मिळवून देण्याची.