कल्याण दि.28 मे :
एकीकडे लॉकडाऊनमूळे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असतानाच खासगी लॅबचे (प्रयोगशाळा) कोवीड चाचणीचे दर कमी करण्याची मागणी नागरिकांनी राज्य सरकारला केली आहे. तर केंद्र सरकारच्या आयसीएमआरनेही (इंडियन कौन्सिल फॉर मेडीकल रिसर्च) खासगी लॅबचे दर कमी करण्याबाबत सरकारने निर्णय घेण्याचा सूचना केल्या आहेत.
सध्या कोरोनामुळे केवळ आरोग्याचेच संकट उभे ठाकलेले नसून त्यापाठोपाठ आलेले आर्थिक संकटही मोठे आवाहन ठरत आहे. अशात दुर्दैवाने जर एखाद्या घरामध्ये कोरोनाग्रस्त आढळला तर ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी मध्यमवर्गीय लोकांची अवस्था होत आहे. कारण घरातील संबंधित कोरोनाग्रस्त व्यक्तीबरोबरच इतर सर्व कुटुंबियांचीही किमान 2 वेळा कोरोना चाचणी करावी लागते. खासगी लॅबकडून एका व्यक्तीच्या चाचणीसाठी साधारणपणे 4 ते साडेचार हजार रुपये इतका दर आकारला जातो. त्यामुळे या चाचण्या करण्यामध्येच संबंधित कुटुंबाचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहेत. आधीच उत्पन्न तुटपुंजे किंवा बंद असल्याने संबंधित लोकं त्या विवंचनेत असताना कोवीड चाचण्यांच्या दराच्या ओझ्याखाली ते अजून दबले जात असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खासगी लॅबच्या कोवीड चाचणीचे दर निम्म्यापेक्षा कमी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
दरम्यान केंद्र सरकारच्या आयसीएमआर या संस्थेनेही खासगी लॅबच्या कोवीड दराबाबत राज्य सरकारला हस्तक्षेप करण्याची सूचना केली आहे. कोवीड चाचणीचे किट तयार करण्यासाठी अनेक स्थानिक कंपन्यांना परवानगी देण्यात आली असून या चाचण्यांचे विविध पर्यायही खुले झाले आहेत. त्यामुळे खासगी लॅबचे दर कमी केले जाऊ शकतात अशी सूचना आयसीएमआरने केली आहे.
सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकारनेही यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन लोकांना दिलासा देण्याची गरज आहे.