डोंबिवली दि.18 जून:
कल्याण-शीळ रोडवरील निळजे पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आयआयटीने रेल्वेला दिलेल्या अहवालात हा पूल धोकादायक ठरला होता. मात्र या पुलावरून होणारी वाहतूक बंद झाल्याने वाहतूक कोंडीमध्ये अधिक भर पडली आहे. त्यामुळे या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी सुरू करण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी केली आहे.
आमदार पाटील यांनी वाहतूक पोलीस अधिकारी आणि एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसोबत या पुलाच्या पाहणी दौऱ्यात हलक्या वाहनांसाठी पूल वाहतूकीसाठी खुला करता येईल का याची चाचपणी केली. तर जड-अवजड वाहनांची वाहतूक कल्याण शीळ-रोडवर बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून ही वाहने तळोजामार्गे वळवण्यात येणार आहेत.
अंबरनाथ,बदलापूर,कल्याण,डोंबिवलीमधून ठाणे आणि मुंबईच्या दिशेने वाहनचालक मोठ्या संख्येने जात असतात. कल्याण- शिळ महामार्गावरील असलेल्या निळजे पुलावरून जाणारी मुंबई ठाण्याच्या दिशेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावरील वाहतूक बंद केल्याने उल्हासनगर, अंबरनाथ,कल्याण डोंबिवली रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकादेखील वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडत होत्या. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना करावा लागत आहे. त्यासाठी या पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश देऊन वाहनचालकांची डोकेदुखी दूर करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
यावेळी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता बडोळे , टीम लीडर संतोष गुप्ता वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप उगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ, रेल्वेचे मुंबई डिव्हीजनल अभियंता ए. के.हिवाळे आणि संदीप सिन्ना यांच्या उपस्थितीत पुलाची पाहणी करण्यात आली.
*आमदार राजू पाटील यांनी केली कोव्हिड सेंटरची पाहणी*…
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात सुरू असलेल्या कोव्हिडं सेंटरच्या कामाचीही आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली.यावेळी लवकरच हे कोव्हिडं सेंटर उपचारासाठी सुरु होणार आहे असे केडीएमसी अधिकारी शैलेश मळेकर यांनी सांगितले.