डोंबिवली दि.4 जून :
डोंबिवलीच्या काही भागात वीजपुरवठा बराच काळ खंडित झाल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिलेली पाहायला मिळाली. काल सकाळपासून वादळाचे कारण सांगून डोंबिवलीत वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. परंतु आज दुपारपर्यतत वीजपुरवठा सुरु न झाल्याने नागरिकांनी महावितरण अभियंतांना फोनद्वारे संपर्क साधला. मात्र काही जणांचे फोन उचलण्यात न आल्याचे तर काहींना व्यवस्थित उत्तर न मिळाल्याने मिलाप नगर परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. तसेच वीजपुरवठा कधी सुरळीत होणार याबाबत महावितरण अधिकाऱ्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
काल रात्री दहाच्या सुमारास काही ठिकाणी वीज आली. तर काही ठिकाणी आज दुपारपर्यंत वीज आली नव्हती. लाईट नसल्याने पाण्याच्या मोटारही लावता न आल्याने लोकांना पाणीही मिळाले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवली निवासी परिसरात वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असून केबल फॉल्ट, ट्रान्सफॉर्मरला आग लागणे, स्पार्क होणे, ट्रान्सफॉर्मरमधुन स्फोटासारखा आवाज येणे अशा अनेक कारणांमुळे वीज खंडित होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी लॉकडाऊन असतानाही महावितरण कार्यालयावर धडक देत आपला राग व्यक्त केला.