कल्याण दि.3 जून :
निसर्ग चक्रीवादळाचा फटका कल्याण डोंबिवली परिसरालाही बसण्याची शक्यता गृहीत धरून महापालिका प्रशासन सज्ज झाले असून अग्निशमन दलासह आपल्या सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण, पालघर अतिमूसळधार तर मुंबई ठाणे रायगड काही ठिकाणी अतिमूसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने संबंधित यंत्रणाना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत .याबाबत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी विशेषतः ज्या ठिकाणी झाडे, विजेचे खांब पडू शकतात त्या ठिकाणी खबरदारी घेण्यासह जेसीबी, पोकलन मशीन तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत .
प्रभाग अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत पालिकेच्या रुग्णांलयासह खासगी कोव्हिड रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय होवु नये म्हणून तत्काळ बॅटरी जनरेटर बॅकअप घेण्यास सांगितले आहे. तसेच खाजगी रुग्णालयाना कोणत्याही रुग्णलयीन कर्मचारी डॉकटर,नर्सेस याना रजा देऊ नये. तसेच रुग्णालये सुरूच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केडीएमटीचे बसेस कर्मचाऱ्यांसह सज्ज ठेवण्यात आले असून काही अनुचित प्रकार घडून लोकांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास संक्रमण शिबिरांचेही निर्जंतुकरण करण्यात आले आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
दरम्यान काल रात्रीपासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाच्या सरी कोसळत असून वाराही सुटला आहे. त्यामूळे महापालिका प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.