कल्याण दि.2 जून :
अतितीव्र चक्रीवादळादरम्यान विजेचे खांब तसेच वीजवाहिन्यांचे नुकसान होण्याची शक्यता असून वीजपुरवठाही खंडित होऊ शकतो. अशावेळी सर्वांनी आपले मोबाईल्स, इन्वर्टर संपूर्णपणे चार्ज करावेत, तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यासुद्धा पंपाद्वारे भरून ठेवाव्यात, जेणेकरून चक्रीवादळादरम्यान आपणास अडचणींचा सामना करावा लागणार नाही असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
महावितरणची बहुतांश वीज वितरण यंत्रणा उघडयावर आहे. संभाव्य अतितीव्र वादळामुळे महावितरणच्या या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. चक्री वादळामुळे विजेचे खांब, रोहित्र कोसळण्यासोबतच वीजवाहक ताराही तुटू शकतात. परिणामी अशा ठिकाणी दीर्घ काळापर्यंत वीजपुरवठा बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन या परिस्थतीला तोंड देण्याची तयारी केली आहे. परंतु संभाव्य अडचण पाहता नागरिकांनी मोबाईल, इन्व्हर्टर संपूर्णपणे चार्ज करून ठेवावेत. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरून ठेवाव्यात, जेणेकरून अडचणीच्या परिस्थितीत त्रास होणार नाही. अपघातांची शक्यता गृहीत धरून वीज वितरण यंत्रणांपासून सुरक्षित अंतर राखावे आणि संभाव्य नैसर्गिक आपत्तीत महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
*#LNN*
*#LocalNewsNetwork*