कल्याण दि.29 मे :
कोरोनामुळे आपण एका कठीण परिस्थितीतून जात असलो तरी येणाऱ्या काळात उद्योजक बनण्यासाठी महिलांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असतील असे मत शिक्षण अभ्यासक आणि पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांनी व्यक्त केले. कोरोना आणि वुमन इंटरप्रेनरशीप या महिला उद्योजिकांसाठी आयोजित आगळ्या वेगळ्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
सध्या कठीण काळ असला तरी तो बाहेर आहे. तुम्ही शांत राहून नीट विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल की उद्योग- व्यवसायासाठी अनेक नवे पर्यायही उपलब्ध आहेत. “नारी ही नसून आणि आताच्या काळात तिला व्यापारी (उद्योजिका) बनण्याची मोठी संधी आहे. पारंपरिक पद्धती सोडून आता वेगळा विचार करण्याची गरज असल्याचे बिपीन पोटे यांनी सांगितले.
कोणताही व्यवसाय हा कोणत्या न कोणत्या समस्येचा उपाय असतो. आताची वेळ ही स्वतःचा फायदा बघण्याची नसून एकमेकांच्या मदतीने टिकून राहण्याची आहे. लोकांच्या गरजा बदललेल्या नसून त्या गरजा पूर्ण करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. आज स्पर्धेला अजिबात महत्व नसून मार्केटमध्ये उभं राहणं आवश्यक आहेत. त्यामुळे येत्या काळात तेच उद्योग-व्यवसाय टिकतील जे स्वतःची व्यवसाय करण्याची पद्धत बदलतील असेही पोटे यांनी सांगितले.
कोणताही प्रॉब्लेम हा कायम स्वरूपी नसून एक ना एक दिवस तो संपणारच आहे. आपल्याला या काळातही टिकून राहायचं असेल तर शिस्तबद्धता, नविन गोष्टी शिकण्याचा ध्यास, संयम, मार्केटचा अभ्यास करण्यासह आपली मानसिक स्थिती उत्तम ठेवणे गरजेचे आहे. कोरोना हा निसर्गाने आपल्यावर फेकलेला असा एक दगड आहे ज्याने आंधळेपणाने धावत असणाऱ्या आपल्यासाठी थोडं थांबण्याची, आयुष्याचा नव्याने विचार करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचेही बिपीन पोटे यावेळी म्हणाले.
तर विकसित देश असो की अविकसित कोवीडने या दोघांनाही एकाच रांगेत आणून उभं केलं आहे. त्यामुळे टिकायचे असेल तर आपल्याला आपली मानसिकता बदलणे आवश्यकच असल्याचे मत महिला उद्योजिका आणि आगरकर सेंटर ऑफ एक्सीलन्सच्या संस्थापिका फातिमा आगरकर यांनी यावेळी व्यक्त केले. आपण काल जे शिकलो आहे तेच आज पण कोरोनाच्या काळात लागू होणार नाही. पुढील दिड -दोन वर्षे कठीण असून महिलांनी या आव्हानातील संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे असेही आगरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्योग-व्यवसाय टिकून राहण्यासाठी एकमेकांचा सहयोग अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्या व्यवसायासाठी एखाद्या यशस्वी उद्योजकाची मदत घेण्याची सूचनाही आगरकर यांनी यावेळी व्यक्त केली.
तर व्यवसायाबरोबरच आपल्याला आपले कुटुंब, आरोग्य आणि व्यवसायासाठी लागणारा निधी या तीन गोष्टीही तितक्याच महत्वाच्या असल्याचे मत सीए जयंत फाळके यांनी व्यक्त केले. फाळके यांनी व्यवसायाची आर्थिक घडी कशी बसवायची आणि कठीण परिस्थितीत व्यवसाय कसा टिकवून ठेवायचा याबाबत मार्गदर्शन केले.
या वेबिनारमध्ये 100 हुन अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. ज्यामध्ये लहान-मोठ्या उद्योजिकांसह अनेक इतर महिलांचा समावेशही मोठा होता.