कल्याण दि.०७ जून :
अतितीव्र निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यात महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेची मोठी हानी झाली आहे. रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीच्या कामाला वेग देण्यात आला असून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत स्वतः कामाच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक निर्देश देत आहेत. ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार कल्याण परिमंडलातील २५ अभियंते, ८० कर्मचारी, ८ कंत्राटदार आणि त्यांचे १७० कामगार कोलमडलेल्या वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीत मदत करण्यासाठी रायगडला रवाना झाले आहेत.
वादळाच्या तडाख्याने रायगड जिल्ह्यातील हजारो वीजखांब, रोहित्र आणि शेकडो किलोमीटर वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेच्या दुसऱ्या दिवशीच ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी प्रधान ऊर्जा सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू त्यांचासमवेत जिल्ह्याचा दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच दुरुस्तीच्या कामाला वेग देण्यासाठी मनुष्यबळ तसेच साहित्य पुरविण्याचे निर्देश दिले.
त्यांच्या निर्देशानुसार कल्याण मंडल कार्यालय एक आणि दोन, वसई व पालघर मंडल कार्यालयातून २५ अभियंते व ८० कर्मचारी शुक्रवारी व शनिवारी (०६ जून) अत्यावश्यक साहित्य व वाहनांसह रायगडला रवाना झाले आहेत. त्यांच्यासमवेत ८ कंत्राटदार व त्यांचे १७० कामगारही रायगडला गेले असून पेण, अलिबाग, माणगाव, म्हसळा, खालापूर, रोहा भागात दुरुस्तीच्या कामात सहभागी झाले आहेत. पुढील आठ दिवस हे अभियंते, कर्मचारी व कामगार वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात मदत करणार आहेत. त्यानंतरही आवश्यकता भासल्यास आणखी मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री डॉ. राऊत हे रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा दररोज आढावा घेत आहेत. शेवटच्या घराचा वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत कामाचा वेग कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनीही रायगड जिल्ह्यात कल्याणच्या पथकाकडून काम सुरु असलेल्या ठिकाणी पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
*कल्याण परिमंडलातील दुरुस्तीची कामे पूर्ण*
निसर्ग चक्री वादळामुळे कल्याण परिमंडलात १६८ विजेचे खांब, ८ रोहित्र व ३२ किलोमीटर वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या होत्या. वादळाचा वेग ओसरताच युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार सातत्य व गतीने काम करून गेल्या चार दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून परिमंडलातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.