कल्याण दि.29 मे :
लॉकडाऊन सुरू असल्याने कल्याण पश्चिममध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात अडकून पडले होते. लॉकडाऊनमुळे शहरातील उद्योगधंदे बंद असल्याने कामगारांना आपल्या मूळ ठिकाणी परत जायचे होते, मात्र परवाना – प्रवास व्यवस्था होत नसल्याने कामगार चिंताग्रस्त होते. भाजपा प्रदेश सचिव तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून कामगारांना आज त्यांच्या मूळ राज्यात उत्तर प्रदेश येथे जाण्यासाठी विशेष रेल्वेद्वारे ध्वज दाखवत निरोप दिला.
दरम्यान कामगारांची अडचण लक्षात घेण्यासाठी नरेंद्र पवार यांनी कामगारांशी संवाद साधला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा करत कल्याणमधील परप्रांतीय कामगार-नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी तातडीने विशेष रेल्वे देण्याची मागणी केली होती. यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडेही पाठपुरावा केला होता, त्यांनीही सहकार्य केले.
त्यानंतर आज रेल्वे विभागाने विशेष रेल्वे उपलब्ध करून दिली. दरम्यान माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सर्व कामगारांशी संवाद साधून परवाना काढून त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी मार्ग मोकळा केला होता. शिबिराच्या माध्यमातून त्यांचे मेडिकल चेकअपही पूर्ण केलेले आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आज रेल्वे उपलब्ध झाल्यानंतर हजारो कामगार आनंदाने आपल्या घराकडे रवाना झाले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, तहसीलदार दीपक आखाडे यांनी सर्व कामगारांच्या भोजनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावेळी केली होती.
आपापल्या ठिकाणी गेल्यानंतर प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळा, आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. कोरोना मुक्तीसाठी सोशल डिस्टन्स ठेवा असे आवाहन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कामगारांना बोलताना केले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनकर, टिटवाळा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, रेल्वे पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल, स्टेशन संचालक लहोटकर, स्टेशन मॅनेजर जैन, सहाय्यक पोलीस निरीक्षक डोळे आदी अधिकारी तसेच नगरसेवक कुणाल पाटील, नगरसेविका उपेक्षा भोईर, भाजपा सरचिटणीस अमित धाक्रस, बुधाराम सरनोबत, रवी गुप्ता, शक्तीवान भोईर, आर. पी. मिश्रा, संतोष शिंगोळे, अनंता पाटील, प्रकाश पाटील, महेंद्र मिरजकर, सुरेश कनोजिया, संजय कारभारी, जक्की पाकुर्डे, प्रताप टूमकर, विनायक भगत आदी पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.