कल्याण दि.8 जून :
कल्याण-शिळ मार्गावरील जुना निळजे पूल तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करून हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीला केली आहे.
कल्याण शिळ मार्गावरील निळजे गावातील रेल्वे ट्रॅकवर असणारा जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटीने दिला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात येणार असून त्याऐवजी शेजारील नविन पुलावरून सर्व वाहतूक वळवली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र हा पूल वाहतुकीला बंद झाल्यानंतर वाहन चालकांना मोठ्या अडीचणींचा सामना करावा लागू शकतो. परिणामी या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून किमान हलक्या वाहनांसाठी तरी तो सुरू ठेवण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान आधीच पावसाळा तोंडावर आहे, त्यात पत्रीपुलाचे काम आणि कल्याण -शिळ रस्त्याच्यास सहा पदरीकरणाचे कामही सुरू आहे. अशात या उड्डाणपुलावरील वाहतूक बंद झाल्यास वाहन चालकांना होणाऱ्या त्रासाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.