कल्याण दि.8 जून :
अनलॉक1 मधील ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत आजपासून खासगी कार्यालये सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र अनलॉक1 च्या पहिल्याच दिवशी एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. त्यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांसाठी हा पहिला दिवस चांगलाच मनस्तापाचा ठरला.
अनलॉक 1 मधील 3 ऱ्या टप्प्यानुसार आजपासून खासगी कार्यालयेही सुरू झाली. त्यामुळे कामावर जाण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं घराबाहेर पडली. आधीच मनामध्ये कोरोनाची धास्ती असताना आजच्या पहिल्या दिवसाचा अनुभव मोठा त्रासदायी ठरला. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकामध्ये कामावर जाण्यासाठी बसची वाट पहात असणाऱ्या लोकांची मोठी गर्दी दिसून आली. मात्र याठिकाणी प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारे गर्दीचे नियोजन करण्यात न आल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नव्हते. इंदिरा चौकातील ही रांग थेट फडके रोडपर्यंत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
तर दुसरीकडे कल्याण -शिळ मार्ग आणि कल्याण-भिवंडी मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झालेली पाहायला मिळाली. या दोन्ही ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे. मुळात कल्याण-शिळ रोड आणि कल्याण-भिवंडी रोड या दोन्ही ठिकाणी अत्यंत संथगतीने काम सुरू असून लॉकडाऊन ओपन होणार असल्याने त्यादृष्टीने कंत्राटदाराने उपयोजना करणे आवश्यक होते. तसेच लॉकडाऊनच्या काळातही ज्या गतीने काम होणे आवश्यक होते ने झाले नसल्याने आता याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याची प्रतिक्रिया वाहन चालकांनी व्यक्त केली. तर पावसाळा सुरू झाल्यानंतर याहून भयानक परिस्थितीला आम्हाला सामोरे जावे लागेल अशी भितीही लोकांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यातील ही गंभीर परिस्थिती टाळायची असेल तर आताच पुढील काही दिवसांत प्रशासनाने त्यासाठी उपाय योजना करण्याची मागणीही व्यक्त होत आहे.
एकंदरीत अनलॉक 1 चा पहिला दिवस हा लोकांसाठी मोठ्या त्रासाचा ठरल्याचे दिसून आले.