फोटो सौजन्य :-, दिपक जैस्वार, एलएनएन सिटीजन रिपोर्टर
कल्याण दि.17 जून :
आधीच पत्रीपुलामुळे हैराण झालेल्या कल्याण-डोंबिवलीकरांच्या डोकेदुखीमध्ये आता निळजे पुलाची भर पडली आहे. कल्याण-शिळ मार्गावरील काटई टोलनाका ते लोढादरम्यान असणारा जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी नव्या पुलावरून वाहतूक वळवण्यात आल्याने या परिसरात प्रचंड अशी वाहतुकीची कोंडी झालेली पाहयाला मिळत आहे.
आधीच गेल्या दिड वर्षांपासून पत्रीपुलाच्या कामामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या नाकी नऊ आले आहेत. त्यात आता कल्याण शिळ मार्गावरील या पुलाचीही भर पडल्याने लोकांची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ अशी झाल्याची दिसतेय. तर लॉकडाऊन उठवण्यात आल्याने शासकीय कार्यालयांबरोबरच खासगी कार्यालयही मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून दररोज नागरिक मोठया संख्येने बाहेर पडत आहेत. त्यातच 15 जूनपासून जुन्या निळजे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. काटई टोलनाका ते लोढा चौक एवढ्याशा अंतरासाठी लोकांना 2-2 तास लागत आहेत. यावरून इथल्या भयानक परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.
त्यात टोलनाक्यावर टोल घेण्यासाठी अवजड वाहने थांबत असल्याने त्याचाही वाहतूक कोंडीवर परिणाम होत आहे.
तर गेल्या अडीच तीन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात पुलाचे काम का करण्यात आले नाही असा संतप्त सवाल नागरिक विचारताना दिसत आहेत.