कल्याण दि.8 जून :
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कचरा वर्गीकरण मोहीम लोकप्रतिनिधीना विश्वासात न घेता सुरू केली आहे. ही मोहीम तात्पुरत्या कालावधीसाठी न थांबवल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सत्यपरिस्थिती आणून देऊ असा इशारा नगरसेवक श्रेयस समेळ यांनी दिला आहे. तसेच पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.
मुळातच महापालिकेने सुरु केलेल्या “शून्य कचरा मोहिमेचा”फज्जा उडालेला आहे. सर्वत्र रस्त्यांवर कचरा पडलेला दिसत आहे. ओला-सुक्का कचरा वेगळा झालाच पाहिजे.परंतु ती ही वेळ नसून सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना लॉकडाऊनमध्ये सुरु झालेल्या या मोहिमेमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे श्रेयस समेळ यांनी सांगितले. सोसायटीमध्ये येत नसणारे खासगी कामगार, सोसायटीकडे वर्गीकरण करण्यासाठी कमी असलेले कचऱ्याचे डब्बे, चाळींच्या आणि झोपडपट्टीच्या ठिकाणी घंटागाडी न पोहोचणे, घंटागाडीचे नियोजन नसणे, नियोजन शून्य मोहिम राबविली जात असून सर्व कचराकुंड्या उचलून नेल्यावर नागरिक नाईलाजास्तव रस्त्यावर कचरा टाकत असल्याचेही ते म्हणाले.
तर याबाबत आपण उपायुक्त रामदास कोकरे यांना विनंती केली होती की लॉकडाऊन संपल्यावर व्यवस्थित नियोजन करून, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ही मोहीम राबवूया. परंतु ते कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याचे तसेच आमचे सर्व पदाधिकारीही त्यांच्यासमोर हतबल झालेले दिसत असल्याचे समेळ म्हणाले. त्यामुळे एक तर तात्पुरती ही मोहीम थांबवावी अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन सत्यपरिस्थिती समोर आणावी लागेल असा इशारा समेळ यांनी एलएनएनशी बोलताना दिला आहे.