कल्याण दि.12 जून :
एकीकडे कोरोनाच्या त्रासासोबतच निसर्ग चक्रीवादळानेही कोकणवासियांचे मोठे नुकसान केले आहे. या कोकणवासीयांच्या मदतीसाठी कल्याण पूर्वेचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी 2 हजार अन्नधान्याचे किट पाठवण्यात आले आहेत.
आधीचा कोरोनामुळे चिंतेत असणारा कोकणी बांधव निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडला. लॉकडाऊन काळात कसेबसे सुरू असलेले संसार या वादळाने जणू उध्वस्तच केले. घरं, शेती, फळबागा, वाड्या उद्धवस्त झाल्याने आता कोकणी बांधवासमोर उघड्यावर पडलेला संसार सावरतानाच उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. राज्य सरकारने या बाधितांना मदतीचे आश्वासन दिले असून त्यानुसार कार्यवाहीही सुरू आहे. त्याच जोडीला आता या कोंकणवासीयांच्या मदतीसाठी कल्याण पूर्वेचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड पुढे सरसावले आहेत. वादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागातील नागरिकांसाठी अन्नधान्याचे किट घेऊन काल रात्री कोकणाच्या दिशेने ट्रक रवाना झाले आहेत. जोपर्यंत तेथील जनजीवन सुरळीत होत नाही, तोपर्यंत कल्याण पूर्व शिवसेनेकडून अन्नधान्याची मदत सुरूच राहणार असल्याचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगीतले.