कल्याण दि.7 जुन :
एकीकडे कल्याण डोंबिवलीत आधीच कोरोनामुळे नागरिक चिंतेत असतानाच आता कचऱ्याच्या समस्येमूळे ते हैराण झाले आहेत. वर्गीकरण केलेला कचरा नेण्यासाठी गाडीच येत नसल्याने नाईलाजास्तव तो पुन्हा रस्त्यांवर टाकला जातोय. ज्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर साथीचे आजार पसरण्याची भिती व्यक्त होत आहे.
कोरोनाने कल्याण डोंबिवलीत हातपाय पसरायला सुरुवात केली असतानाच पालिकेने नागरिकांना कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले. ठराविक दिवशी ओला आणि सुका कचरा उचलला जाईल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात वेगळेच घडताना दिसत आहे. नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतरही बरेच दिवस तो घेण्यासाठी घंटागाडीच येत नाही. त्यामूळे वर्गीकरण सुरू केल्यानंतर आता नागरिकांना नाईलजास्तव रस्त्यावर कचरा टाकावा लागतोय. मात्र कल्याण आणि डोंबिवलीतील सर्व कचराकुंड्या महापालिकेतर्फे हटवण्यात आल्याने रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचत चालले आहेत.
कल्याण डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या कचरा वर्गीकरण सक्तीबाबत कोणाचेही दुमत नसेल. मात्र वर्गीकरण केलेला कचरा उचलला जात नसेल तर घरात साचणाऱ्या कचऱ्याचे काय करायचं? हा मुख्य प्रश्न नागरिकांसमोर आहे. आधीच कोरोना रुग्णांची संख्या वाढतचं चालली आहे. त्यात पावसाळ्याच्या तोंडावर ही समस्या उग्र रूप घेण्यापूर्वी महापालिकेने त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. तर महापालिकेच्या या कचऱ्याबाबतच्या भूमिकेवरून सर्वच लोकप्रतिनिधीनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
ठाणकर पाडा, (7 जुन 2020) -फोटो सौजन्य : स्वरूप ठाणकर, एलएनएन सिटीजन रिपोर्टर
रामबाग मेन रोड (7 जून 2020 सकाळी 10 वाजता): रवी जैन, एलएनएन सिटीजन रिपोर्टर