कल्याण दि.10 जून :
कल्याणमध्ये चार दिवसांपूर्वी एटीएममध्ये झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य सुत्रधारासह 3 जणांना अटक केली असून कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाच्या गडबडीत पोलिसांचे याकडे लक्ष जाणार नाही या समाजातून हा गुन्हा करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
५ जून रोजी कल्याण स्टेशनबाहेरील एटीएममधून लाखो रुपयाची रक्कम चोरीला गेली. मात्र एटीएम न फोडता केवळ पासवर्डने लॉकर उघडून ही रक्कम काढण्यात आली होती. या प्रकरणी बँकेनही एटीएम ऑपरेटर्सवर संशय व्यक्त केला होता. एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीत किरण पंडित हा एटीएम ऑपरेटर म्हणून काम करत होता. एकीकडे करोना आणि दुसरीकडे गेल्या आठवड्यात आलेल्या निसर्ग वादळामूळे सुरक्षा यंत्रणा व्यस्त असून या प्रकरणाच्या तपासाकडे फारसे लक्ष दिले जाणार नाही असे त्याला वाटले. आणि किरणने कल्याणातील एटीएम माशीनमधून तब्बल 49 लाखांवर डल्ला मारला. या गुन्ह्यासाठी किरणला जयदीप आणि जुगल किशोर यांनीही मदत केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी सुरुवातीला अमर आणि चेतन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्यांना या चोरीबाबत काहीही माहिती नसल्याचे समोर आले. त्यांना ही रक्कम भरण्यासाठी किरणने पाठवल्यानंतर काही वेळातच त्याने आपल्या इतर साथीदाराच्या मदतीने ती काढून घेत त्या दोघांना यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महात्मा फुले पोलिसांनी पोलिसांनी कौशल्य पूर्ण तपास करत या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावला.
पोलिसांनी त्यांच्याकडून 39 लाख 85 हजार रुपये रोख रकमेसह 42 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.