कल्याण दि.16 जून :
ठाण्यातील कोरोना रुग्ण वाढत असल्याने पालकमंत्री बदली करा अशी घरबसल्या मागणी करणाऱ्या भाजप नेते आशिष शेलार यांच्या बुद्धीची कीव येत असल्याची टिका शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाण्यातील पत्रकारांशी संवाद साधत पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर टिका केली होती. त्यावर ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी,नेत्यांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यासह शेलार यांच्यावर टीकेचा भडिमार केला जात आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात आले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण असे ठिकठिकाणी भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. करोनाबाधित रुग्णांची विचारपूस करण्यासाठी स्वत: पीपीई किट घालून ते सिव्हिल रुग्णालयातील करोना वॉर्डातही गेल्याचे सर्वश्रुत आहे.
अशा 18-18 तास फिल्डवर उतरून लोकांसाठी झटणाऱ्या व्यक्तीबाबत बोलण्याचा आशिष शेलार यांना अजिबात नैतिक अधिकार नसल्याचे प्रकाश पेणकर यांनी सांगितले. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या नावाखाली उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे प्रकार त्यांनी त्वरित थांबवावे अशा शब्दांत पेणकर यांनी शेलार यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतला आहे.